प्रजासत्ताक दिन: आदर्श सूत्रसंचालन- 1

26 जानेवारीचे सूत्रसंचालन प्रभावी कसे करावे? पहा ५ सोप्या स्टेप्स आणि रेडीमेड स्क्रिप्ट

तुम्ही पहिल्यांदाच सूत्रसंचालन (Anchoring) करणार असाल, तर घाबरू नका! आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्टेजवर बोलण्यासाठी आवश्यक असणारी रेडीमेड मराठी स्क्रिप्ट आम्ही तयार केली आहे. ध्वजवंदनापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणापर्यंत प्रत्येक प्रसंगासाठी नेमके काय बोलावे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

प्रजासत्ताक दिन: आदर्श सूत्रसंचालन

१. मंगलमय प्रारंभ आणि स्वागत (व्यासपीठाला वंदन करून उत्साही आवाजात सुरुवात करावी)
“मंगल क्षणी या भाग्य लाभले, तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाचा सोहळा!
देशाभिमान उरी दाटला, गर्जू दे जयघोष आता सोहळा विजयाचा!”

आज आपण येथे भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रतिवर्षी 26 जानेवारीला हा राष्ट्रीय उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मी सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांचे शब्दांच्या सुमनांनी सहर्ष स्वागत करतो.

२. ध्वजारोहण विधी (मुख्य क्षण) (सर्व उपस्थितांना सतर्क राहण्याची सूचना द्यावी)

आदेश: “सर्व विद्यार्थी मित्रांनी सावधान स्थितीत उभे राहावे. सावधान… विश्राम… सावधान!”

सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वज फडकवून आपल्या राष्ट्रध्वजाचा मान उंचवावा. (ध्वजारोहण झाल्यावर) राष्ट्रगीत सुरू होईल, सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी.

भारत माता की जय! वंदे मातरम!

३. मान्यवरांचे स्वागत आणि दीपप्रज्वलन
“एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगा,
कारण व्यक्ती संपते पण व्यक्तिमत्त्व सदैव जिवंत राहते!”

मी मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. ‘अतिथी देवो भव’ या परंपरेनुसार आपण त्यांचे स्वागत शब्दांच्या फुलांनी करूया. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा मंगल आरंभ करूया.

४. प्रास्ताविक: संविधानाचा गौरव

15 ऑगस्ट 1947 ला मिळालेल्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली ती 26 जानेवारी 1950 रोजी. भारतीय राज्यघटनेने आपल्याला शिक्षण आणि मूलभूत अधिकार दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांत ही महान राज्यघटना साकारली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

५. विचारांचे मंथन (भाषणे)

आता मी काही गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. (विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर:)

“विविधतेत एकता आहे आमची शान,
म्हणूनच आहे माझा भारत देश महान!”

केवळ भाषणे देऊन चालणार नाही, तर भ्रष्टाचार, जात-पात आणि निरक्षरता यांसारख्या समस्या दूर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे मोलाचे मार्गदर्शन आता आपल्यासमोर शिक्षक करणार आहेत.

६. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव

प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वजवंदन नव्हे, तर राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखणे होय. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज उचलणे आणि आपल्या देशाच्या नकाशाचा, राष्ट्रगीताचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी घेणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.

७. आभार प्रदर्शन आणि समारोप
“दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते,
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचे सुंदर नाते तयार होते!”

हे नाते टिकवण्यासाठी आभाराची गरज असते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जशी विविध रंगांची फुले बागेचे सौंदर्य वाढवतात, तसेच विविध भाषा-धर्माचा आपला हा देश संविधानाच्या एका धाग्यात गुंफलेला आहे.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now